ग्रीष्म
भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात
स्वारि बाइ केवि आलि !
घर्मि अंग अंग न्हालि !
आलि गालिं बाइ लालि,
उतरिन जलकुंभ मी ! ध्रु०
तापे शिरिं अंशुमालि,
आग आग भोवतालि,
रखरखीत ह्या अकालिं
अग्निच्या जिभा झळा ! १
तरुतळिं बसुनी विवशी
रवंथ करिति गाइम्हशी,
गुपचुप हे पशुपक्षी
दडति गुहाकोटरीं. २
पक्षि एकटा सुतार
ठकठक करि बेसुमार,
सारखा करी प्रहार,
ध्वनि गभीर खोल हा ! ३
पोपट पिंजर्यांत शांत
चित्रसा बसे निवांत,
श्वान हलुनि नखशिखांत
धापा हें टाकितें ! ४
वाटेवर तप्त धूळ,
फिरके ना मुळिं पाउल,
गांव जणूं निद्राकुल,
सामसूम चहुंकडे ५
आगीची उठे लाट,
तप्त भिंति, तप्त वाट,
तप्त वाट, तप्त खाट,
लाहि लाहि काहिली ! ६
ओढ दासिची नितांत,
आलां या वेळिं कांत !
पाय धुतें, बसा शांत,
वारा मी घालितें ! ७
N/A
कवी - भा. रा. तांबे
जाति - अरुण
राग - सारंग
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १८ ऑक्टोबर १९३५
Last Updated : October 11, 2012

TOP